Monday, October 31, 2016

शहरांच्या शाश्वततेची – त्यांच्या विकासाच्या शाश्वततेची मोजदाद – सस्टेनेबल सिटीज इंडेक्स २०१६ (शाश्वत शहरे निर्देशांक २०१६ )


दिनांक - ३१ / १० / २०१६

शहरांच्या शाश्वततेची – त्यांच्या विकासाच्या शाश्वततेची मोजदाद – सस्टेनेबल सिटीज इंडेक्स २०१६ (शाश्वत शहरे निर्देशांक २०१६ )


आजची शहरे शाश्वत विकासाची कास धरणारी व्हायला हवी तरी ती पुढे जाता शाश्वत शहरे बनतील आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आधी आजची शहरे शाश्वत आहेत की नाहीत, असली तरी ती का आहेत, नसली तर ती कुठल्या कारणांमुळे नाहीत, शाश्वत विकास साध्य करण्यासाठी त्यांनी काय करायला हवे, शाश्वतते कडे त्यांची दर वर्षी प्रगती कशी आणि कितपत होते आहे अशा आणि इतर अनेक पूरक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी शहरांच्या शाश्वततेची मोजदाद, त्यांच्या शाश्वतते कडील प्रगतीची मोजदाद करण्याची पद्धत असावयास हवी आणि ठराविक मुदतीने ती मोजदाद व्हायला हवी. या दिशेने करण्यात आलेला एक प्रयत्न म्हणजे सस्टेनेबल सिटीज इंडेक्स २०१६.

शाश्वत विकास, शाश्वत शहरे ही संकल्पना काही प्रमाणात सापेक्ष आहे, अजून ह्या संकल्पनांची व्याख्या पूर्ण पणे झालेली नाही त्यामुळे त्यांची मोजदाद करण्याचे एकच एक प्रारूप असू शकणार नाही. सस्टेनेबल सिटीज इंडेक्स हा पहिला  प्रयत्न आहे, एक प्रारूप आहे. २०१५ साली ह्याची सुरवात झाली आणि त्या वेळेस जगातील प्रसिद्ध अशा ५० शहरांचा समावेश ह्यात करण्यात आला होता आणि त्यांचा पर्यावरणावर होणार परिणाम, त्यांची शाश्वत होण्याची शक्यता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती – स्थिरता या बाबींचा विचार त्यांच्या शाश्वततेचा अग्रताक्रम ठरवताना करण्यात आला होता. शहरांच्या शाश्वततेची मोजदाद करण्याचा प्रयत्न (दुसरी आवृती - सस्टेनेबल सिटीज इंडेक्स २०१६) विस्तृत करून त्यात १०० शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

शहरांची शाश्वतता मोजायची कशी? सस्टेनेबल सिटीज इंडेक्स ने शाश्वततेच्या तीन बाजूंच्या / अंगांच्या – लोक (सामाजिक), आपली पृथ्वी (पर्यावरण) आणि नफा (आर्थिक ) या माध्यमातून ही मोजमाप करण्याचा  प्रयत्न केला आहे.

शहराच्या आजच्या – तत्कालीन गरजा, शहराच्या भविष्यातील गरजांची कुठल्याही प्रकारे कपात वा नियंत्रण न करता भागवणे, त्यांच्यात समतोल साधणे ही गोष्ट शाश्वत शहराच्या केंद्रस्थानी असते हा विचार, ही व्याख्या सस्टेनेबल सिटीज इंडेक्स ने स्वतःच्या अहवालाच्या पण केंद्रस्थानी घेतली आहे. शहराचे  सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आरोग्य / शाश्वतता तपासण्या साठी एकूण ३२ उप-निर्देशांकांचा वापर केला आहे, त्यातील काही पुढील प्रमाणे आहेत.



अर्थात शहरांची शाश्वतता मोजण्यासाठी कुठल्या मुख्य निर्देशांकांचा आणि कुठले उप-निर्देशांकांचा वापर केला जावा ह्या विषयी मतमतांतर असणार आणि ते असायलाही  हवे पण महत्वाचे हे आहे की शहरांची शास्वतता मोजण्याचे प्रयत्न व्हायला हवे, त्याविषयी विचार व्हायला आणि त्यातून शहरांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन शहरी प्रशासनाने आणि त्या शहराच्या नागरिकांनी आणि घटकांनी त्यांचे शहर शाश्वत करावयास हवे, शाश्वत विकासाची संकल्पना अंगीकारावयास हवी. 

Saturday, October 15, 2016

शाश्वत शहरे, शाश्वत विकास म्हणजे काय?

दिनांक - १५/१०/२०१६ 

शाश्वत शहरे, शाश्वत विकास म्हणजे काय?

शाश्वत शहर सर्वांसाठी हे ध्येय साध्य होण्यासाठी साऱ्यांना शाश्वत शहर म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? त्याचे गुणधर्म कोणते, घटक कोणते? ते कसे साध्य करता येईल? शाश्वत शहर घडण्यासाठी एक व्यक्ति म्हणून मी काय करायला हवे? हे ध्येय साध्य करण्यासाठी जगभर आणि भारतात, आपण राहतो त्या राज्यात, त्या शहरात काय प्रयत्न केले जात आहेत वा कुठल्या बाबी, निर्णय, घडामोडी आपणाला शाश्वत शहर आणि विकास ह्या ध्येयापासून दूर नेत आहेत ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांविषयी चर्चा घडावयास हवी लोक शिक्षण व्हायला हवे आणि इतर भाषांमध्ये ते होईलच पण ते मराठी भाषेत व्हायला हवे आणि महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विकास हा शाश्वत मार्गाने व्हायला हवा म्हणून हा ब्लॉग आणि त्याला संलग्न फेसबुक गट आणि संकेतस्थळ.....

शाश्वत शहर या संकल्पनेची एकच एका अशी व्याख्या नाही – हरित शहर वा पर्यावरण वादी शहर ते शाश्वत शहर असा तिचा प्रवास आहे आणि काळासोबत ती विस्तृत होते  आहे. या संकल्पनेच्या  सध्याच्या व्यापक व्याख्येनुसार पर्यावरण, अर्थकारण, राजकारण आणि संस्कृती ह्या शहरी जीवनाच्या चारही अंगांचा सातत्यपूर्ण शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न शाश्वत  शहर करते.
  
एक निश्चित व्याख्या नसली तरी साऱ्या तज्ञांचे एका बाबतीत एकमत आहे ती म्हणजे शाश्वत शहराने त्याच्या आजच्या गरजा भविष्यातील पिढ्यांची त्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता कमी करून वा तिचा बळी देऊन भागवू नयेत. शाश्वत शहर आणि शाश्वत विकास ह्या संकल्पनेच्या व्याख्येची सापेक्षता, मुग्धता, अनेक अर्थांची शक्यताच तिची सुंदरता आहे, बळ आहे. या संकल्पनेचा मूळ गाभा, तत्व, अर्थ केंद्रस्थानी ठेवून शहरे आणि आपण सारे कल्पकपणे शाश्वतते कडे वाटचाल करू शकतो....

ह्या विषयावर पुढे जाण्यासाठी शाश्वत शहर या संकल्पनेची एक व्याख्या घेऊया. शाश्वत शहर म्हणजे असे शहर ज्याचे सारे घटक – रहवासी, प्रशासन, सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक संस्था -  ऊर्जा, पाणी, अन्न, द्रव आणि इतर सर्व प्रकारच्या नैसर्गिक साधनांचा कमीत कमी उपयोग / अपव्यय करण्यास प्रतिबद्ध असतात; त्याच प्रमाणे कमीत कमी द्रव आणि घन कचरा निर्माण करण्यास, कमीत कमी वायू (कार्बन आणि मिथेन)  आणि जल प्रदूषण करण्यासही प्रतिबद्ध असतात. शाश्वत शहर (सस्टेनेबल सिटी) ला ecocity पण म्हटले जाते कारण पर्यावरणाला कमीत कमी नुकसान अशा शहरामुळे होते.

ecocity हा शब्द सर्वात प्रथम रिचर्ड रेजीस्टर यांनी १९८७ साली त्यांच्या Ecocity Berkeley: Building Cities for a Healthy Future ह्या पुस्तकात वापरला. शाश्वत शहर ही संकल्पना मांडणाऱ्या इतर व्यक्ति म्हणजे वास्तुशास्त्रज्ञ पौल एफ डाऊनटन आणि लेखक टिमोथी बिटले आणि स्टेफन लेहमन. त्यानंतर अर्थातच सारे जग ह्या संकल्पनेला एक या दुसऱ्या प्रकारे विकसित करीत आहे.

शाश्वत शहरे आणि शाश्वत विकास साधणे अत्यंत आवश्यक झाले आहे कारण सध्या जगाची ५० टक्याहून अधिक लोकसंख्या ही शहरांमध्ये रहाते. २०५० साली जगातील शहरी लोकसंख्या सध्याच्या तुलनेत दुप्पट होणार आहे म्हणजे त्यावेळी जवळजवळ ७० टक्के लोकसंख्या ही शहरांमध्ये राहू लागलेली असेल.  जगाच्या पर्यावरणात जे हानिकारक बदल (climat changes) घडून येऊ लागले आहेत त्यांना आळा घालावयाचा असेल, त्यांना थांबवायचे असेल तर शहरी विकास आणि शहरे ही शाश्वत व्हायलाच हवीत आणि त्यासाठी आज आपण स्वतः, वा प्रशासन, वा आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, निरनिराळी सरकारे, शहरांच्या विकासा साठी – निभावणी साठी जे निर्णय घेतात, निरनिराळ्या प्रक्रिया अवलंबतात, प्रकल्प आणि इतर कामे राबवतात  त्या साऱ्यांची शाश्वत विकासाच्या निकषांवर कसून तपासणी व्हायला हवी आणि त्यानुसार अमलीकरण व्हायला हवे. 

Tuesday, October 11, 2016

शाश्वत शहरे सर्वांसाठी



शाश्वत शहरे सर्वांसाठी

शाश्वत शहरी विकास ह्या ध्येयासाठी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (युनो ) गेली ४० वर्षाहून अधिक कार्य करत आहे. ह्या साठी युनो दर २० वर्षांनी जागतिक परिषद आयोजित करते त्यात शाश्वत शहरी विकास आणि घरे ह्या विषयक देश राष्ट्रीय अहवाल आणि पुढल्या २० वर्षासाठीचा राष्ट्रीय अजेंडा, रणनीती सादर करतो आणि ह्या परिषदेत शाश्वत शहरी विकासाचा पुढील  २० वर्षासाठीचा जागतिक अजेंडा ठरवला जातो. भारताने पण होऊ घातलेल्या ह्या जागतिक परिषदेसाठी राष्ट्रीय अहवाल तयार  केला आहे. हा अहवाल ०३ ऑक्टोबर २०१६ रोजी शहरी विकास मंत्री यांनी जाहीर केला पण अजूनही तो साऱ्यांना मिळावा या साठी माहिती महाजालात (वेबसाईट वर ) ठेवण्यात आलेला नाही. 
   
पहिली जागतिक परिषद १९७६ साली हॅबिटाट - १ या नावाने भरविण्यात आली होती. त्यानंतर दुसरी १९९६ साली आणि आता तिसरी जागतिक परिषद हॅबिटाट - ३ या नावाने क्विटो – इक्वेडोर ( QuitoEcuador) येथे १७ ते २० ऑक्टोबर, २०१६ ला होऊ घातली आहे. 

या जागतिक परिषदेला आणखी महत्त्व आले आहे कारण शाश्वत शहरी विकासाच्या संकल्पने विषयी जरी १९७६ पासून विचार होत असला तरी सर्वच बाबतीत शाश्वत विकासाचा विचार एकसंध पणे होत नव्हता. पण दीर्घ चर्चे नंतर जगातील साऱ्या देशांनी नुकतीच शाश्वत विकास ध्येये (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स - एस.डी.जी. ) मान्य केली आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे. 

शाश्वत विकास ध्येये (एस.डी.जी. ) हा भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय विकास संबंधित ध्येयांचा संच आहे. ही ध्येये युनायटेड नेशन्सने बनविली असून  त्यांना साऱ्या देशांनी मान्यता दिली आहे. या ध्येयांनी मिलेनियम विकास ध्येये ज्यांची मुदत वर्ष 2015 च्या शेवटी संपली , त्यांची जागा घेतली आहे. वर्ष 2015 पासून 2030 पर्यंत ही ध्येये लागू ठरतील.  एकूण १७ ध्येये असून या ध्येयांसाठी 169 विशिष्ट ध्येये आहेत. यातले ११ वे ध्येय शाश्वत शहरे हे आहे.
शाश्वत विकास ध्येये आणि शाश्वत शहरी विकासाविषयी संपूर्ण देशात सर्व स्तरावर चर्चा होणे, तदनुसार विकास कामांचे आयोजन आणि अमलीकरण  होणे अतिशय आवश्यक आहे पण तसे ते होताना दिसत नाही. भारतातील आणि इतर अनेक अविकसित आणि विकसनशील देशातील शहरे ‘कृष्णविवरे’ बनली आहेत  नैसर्गिक आणि साऱ्या प्रकारची संसाधने शोषून घेणारी बदल्यात काही न देणारी अथवा सर्व प्रकारचे प्रदूषण, सर्व प्रकारचे पश्न उभे करणारी, समस्या निर्माण करणारी !!

शाश्वत शहरी विकासाची चर्चा, त्या साठीचे आयोजन  होण्या ऐवजी सध्या तरी आपल्या येथे गेल्या दोन वर्षात फारसे काही न होता ‘स्मार्ट सिटी’ योजनेची चर्चा आहे; शहरांना स्मार्ट करण्याची स्पर्धा सुरु आहे, पण खरी गरज आहे भारतीय शहरांनी शाश्वत विकास साध्य करण्याची.
स्मार्ट सिटीचे ध्येय शाश्वत विकास हे असू शकते, असावयास हवे, स्मार्ट सिटी ही सस्टेनेबल सिटी (शाश्वत शहर) असू शकते पण प्रत्यक्षात तसे ते असेलच, घडेलच असे नाही. स्मार्ट सिटी सस्टेनेबल असेलच असे नाही. आधीच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनीकरण  योजनेत आर्थिक शाश्वततेचा पुरेसा विचार न झाल्याने या योजनेच्या अंती वा परिणामी अनेक शहरांची आर्थिक परिस्थिती बिघडली.

भारतीय स्मार्ट सिटी योजना शाश्वत शहरी विकास साध्य करू पाहणारी आहे का, शहरांनी जे स्मार्ट सिटी आराखडे बनवले ते शाश्वत शहरी विकासाचे लक्ष्य सध्या करू पाहणारे आहेत का? शाश्वत विकास म्हणजे काय? शाश्वत शहरी विकास म्हणजे काय? शाश्वत शहरी विकास साध्य करण्यासाठी भारतात आपण साऱ्यांनी काय करावयास हवे? ह्या आणि अशा अनेक पूरक प्रश्नाची चर्चा होणे गरजेचे आहे, ती जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोचावास हवी आणि शक्य झाले तर तिने साऱ्यांना योग्य कृती करण्यास प्रवृत्त करावयास हवे ह्या उद्देशाने ब्लॉग हा सुरु केला आहे,  ह्याच नावाने फेसबुक पेज निर्माण केले आहे. आपण ह्यात सहभागी होऊन ‘ शाश्वत शहरे आणि शाश्वत विकास सर्वांसाठी’ ही चळवळ पुढे न्याल ही आशा .............
शाश्वत शहरी विकास ह्या विषयावर इंग्रजी भाषेत लिहिले जाते आहे पण मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये एकूणच शहरीकरण, शहरे, शहरी विकास इत्यादि विषयांवर फारच कमी लिहिले जाते म्हणून हा मराठीतून प्रयत्न, अर्थात काही माहिती ही इंग्रजी भाषेतून पण प्रसारित करावी लागेल.....